रत्नागिरी : शहरातील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभात शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी पालकांचा स्नेहमेळावाही रंगला. या वेळी ‘वेचू ज्ञानकण’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, बियाणी बालमंदिरच्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी शेट्ये, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय वाघमारे, उपमुख्याध्यापक मिलिंद कदम, ज्येष्ठ शिक्षिका गीता सावंत, भारती खेडेकर यांच्यासमवेत पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. केळकर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला. ‘या शाळेत विद्यार्थ्यांनी उत्तम ज्ञान, संस्कार घेतले. आनंददायी वातावरण अनुभवले. आता पुढील वर्गात विद्यार्थ्यांनी टप्प्याटप्प्याने बुद्धीची प्रगल्भता वाढवावी, वाईटाचा त्याग करावा, आदर्श व चारित्र्यसंपन्न नागरिक बनावे. शाळेला विसरू नका,’ असे आवाहन त्यांनी केले.
पटवर्धन हायस्कूलचे उपमुख्याध्यापक मिलिंद कदम यांनी पाचवी प्रवेशासंदर्भात माहिती दिली. कलागुण, वक्तृत्व, क्रीडा स्पर्धा यात पुढे असलेल्या मुलांची यादी देण्याची विनंती त्यांनी मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांना केली.
या वेळी विद्यार्थी साहिल पाजवे, वनश्री आडिवरेकर, मिथिल पुसाळकर, आकांक्षा केळकर, सांज पाटील, हर्ष वायंगणकर आदींनी मनोगत व्यक्त केले. छान अनुभव, शिक्षकांचे प्रेम, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळाबाह्य उपक्रम यांबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. पालकांनीही मनोगतात शाळा, शिक्षकांचे कौतुक केले. पालक प्रतिनिधी गौरी गवाणकर, आस्था देसाई, सविता पाटील, कल्पना थवी, अर्पिता चौगुले, नयन पुसाळकर, सानिका पवार, श्रद्धा बिर्जे, अनुष्का शेलार, पूर्वा महाडिक, माधवी परब, प्रिया कुलापकर, विदुला घाणेकर, गीता कदम आदींसह सर्व पालक उपस्थित होते.
या वेळी राणा प्रताप, छत्रपती शिवाजी आणि राणी लक्ष्मीबाई या तीन तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी कृतियुक्त गीत सादर करून वाहवा मिळवली. शिक्षक सुधीर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रीती देवरुखकर यांनी आभार मानले.